Thursday, August 14, 2014

चौकट



We place a spherical cage in the desert. enter it and lock it from inside. We then perform an (geometrical) inversion with respect to the cage. Now, the lion is inside and we are outside the cage. 
- (Mathematical methods for) How to catch a lion 



टेबलावरच्या ढिगा-यात कुठेतरी फोन खणखणला. 
“हॅलो! श्रीधर आपटे का?”
“हं”
“मी इन्पेक्टर जाधव बोलतोय. मला अापल्याला भेटायचं होतं”
श्रीधरने थोड्याशा वैतागलेल्या स्वरातचं विचारलं, “अगदीच जरूरी अाहे का भेटणं? urgent असेल तर इथंच बोलू, फोनवर”
“urgent तर अाहेच. किंबूहना थोडं जास्तच urgent आणि तितकच महत्त्वाचंही अाहे. फोनवर नाही बोलता येणार.” श्रीधरचा माणुसघाणा स्वभाव जाधवांना नवीन नव्हता. त्याच्या उत्तराची फार काळ वाट पाहून उपयोग नाही म्हणून त्यांनीच पुढे रेटलं, “ मग अाज संध्याकाळी येऊ?”.
श्रीधर अजूनही एखादा बहाणा चाचपडत असणार हे अोळखून शेवटी त्यांनी अाधी ठरवून ठेवलेली punchline टाकलीच, “अापला अंदाज बरोबर ठरला अाहे. अपेक्षित असलेली सिलीकॉन मुलद्रव्ये सापडली अाहेत”.
“काऽय?” जाधवांना वाटले श्रीधर बसल्या खुर्चीत फुटभर उंचं उडाला असावा, “संध्याकाळी नको, लगोलग निघून या. मी वाट बघतो अाहे. लवकर या”. 
“जरा तुमच्या A.C. चं temperature वाढवून ठेवा, please.” जाधवांनी फोन ठेवला.


श्रीधरच्या डोळ्यासमोर जून्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या. काही महिन्यांपूर्वी न्युयॉर्क शहरात भर उन्हाळ्यात अचानक वादळ अालं होतं. अाजकाल हवामान खात्याचे बहुतेक सर्वच अंदाज बरोबर येत असताना, असं घडणं सगळ्या वैज्ञानिक विश्वात खळबळ माजवून टाकणारं होतं. इतरवेळी श्रीधरच्या हे लक्षातही अालं नसतं. पण सुमारे सात महिन्यांपूर्वी मुंबईत घडलेल्या अशाच एका घटनेचा श्रीधर अभ्यास करत होता. दर वर्षी न चूकता भेट देणारे flamingoes या वर्षी फिरकलेचं नव्हते. श्रीधरला लवकरच या दोन्ही घटनांमधील समान घटकाची सांगड घालता अाली होती. Butterfly Effect! जगात एका जागी घडलेल्या एखाद्या नगण्य घटनेचा, उदा. फुलपाखराने एकदाच पंख फडकवण्यात केलेला सौम्य हलगर्जीपणा, प्रतिसाद काही काळानंतर कुठेतरी लांब दुसरीकडे उमटतो अाणि तेथील भविष्य पार बदलवून टाकतो, तोच हा butterfly effect. श्रीधरच्या अाकडेवारीनुसार मुंबईच्या अासपास शंभर किलोमिटरच्या परिसरात गेल्या एक-दोन वर्षात पृथ्वीच्या बाहेरून अालेलं काहीतरी अादळलं होतं. त्याचाच परीणाम नंतर न्युयॉर्क शहरात जाणवला होता, काहीशा वाढीव प्रमाणातच. अाणि त्यामुळेच पक्ष्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली होती. त्यापदार्थाच्या गतिवरून आणि पृथ्वीतलावर पोहोचलेल्या अाकारमान-वस्तुमानावरून हा पदार्थ अाजही शाबूत असला पाहीजे अाणि अगदी समुद्रात पडला तरी तरंगला पाहीजे असं श्रीधरचं मत होतं. परंतू अशा कोणत्याही घटनेची नोंद न मिळाल्यामुळे श्रीधरला शंका होती, की हे एखादं अंतराळयान असावं अाणि ते परत गेलं नाही (हे ही त्याच्या अाकडेवारीनुसारच!) म्हणजे कदाचित एखादा एलियनही अासपास भटकत असावा. लागलीच त्याने जाधवांना फोन केला होता अाणि अापली शंका बोलून दाखवली होती. 


जाधवांच्या मते असा एलियन असता तर मुंबईसारख्या ठिकाणी अात्तापर्यंत कोणाच्या तरी सहज दृष्टीस पडला असता, “अाजकाल संजय गांधी पार्कातले बिबळेही अर्धावेळ IIT तच राहातात म्हणे. असा अचाट प्राणी लोकांच्या नजरेतून सुटू शकेल असं वाटत नाही.”
श्रीधरने ताडले की जाधव एखाद्या चित्रपटात दाखवलेला पाच-सहा हातांचा प्राणी किंवा अंडाकार डोकं अाणि मोठे काळेशार बदामी डोळे असलेल्या एलियनची कल्पना करत अाहेत. 
“तुम्ही एखाद्या विशिष्ठ जागी भेट द्यायला जाताना पुरत्या तयारीनिशी जाता ना?” स्वेटरची लावलेली बटणं पुन्हा पुन्हा चाचपडणा-या जाधवांना श्रीधर म्हणाला होता, “मग एवढ्या दुरून अालेला एका अतिप्रगत जमातीतील हा सदस्य तयारीनिशी अाला नसेल कशावरून? तो दिसाण्या-वागायला अगदी अापल्यासारखाच नसेल कशावरून?”. “मला तर वाटतं तो वरवर अगदी सामान्य मानव, किंबूहना अगदी बंबैय्याच दिसत असावा.”
“मग अशा माणसाला कसं काय शोधणार अापण?” काकुळतीला येत जाधवांनी सवाल केला.
“त्याच्या इतरांशी होणा-या देवाण-घेवाणीतून.” श्रीधरने याचा अाधीच विचार करून ठेवलेला होता. “बाहेरून जरी त्याने अापल्यासारखा पेहराव केला असला, तरी विज्ञाननियमाप्रमाणे अापलं निरिक्षण करण्यासाठी त्याला अापल्यापासून विभक्त होऊन असं काहीतरी करावंच लागेल. निरिक्षणासाठी त्याने स्वतःची अशी खास उपकरणं अाणलीही असतील, पण सगळ्यात लपवण्यास अवघड म्हणजे मिळवलेल्या माहितीचं देवाण-घेवाण तंत्र. म्हणूनच मी गेले दोन अाठवडे पृथ्वीवरून प्रसारीत होणा-या विद्युतचुंबकीय पटलाची इथंबूत मिमांसा चालवली अाहे.” 
“तिथे तर काही सापडलं नाही, पण अांतरजालावर (iternet) चाललेल्या घडामोडींमध्ये बघा काय सापडलं अाहे.” श्रीधरने एक अालेख जाधवांपूढे धरला होता.
लाल पिवळ्या निळ्या रंगात हजारों रेघा डावीकडून उजवीकडे वर खाली मिळेल त्या दिशेने रेखाटल्या अाहेत एकढेच जाधवांना समजले. असा अालेख शाळेत काढला असता तर मुलाला बेदम चोपला असता, एक विचार जाधवांच्या मनात सरकून गेला.
“पाहा, पाहा! अाहे की नाही गंमत?”
“अाहे खरी. पण…” 
जाधवांना काहीही समजलेलं नाही हे लक्षात घेऊन श्रीधरने समजवायला सुरूवात केली, “अहो, हा अालेख अाहे भारतातून आंतरजालावर होणा-या प्रत्येक तासाला होणा-या सरासरी माहिती वहनाचा. काही महत्त्वाचे सामाजिक प्रसंग सोडले, तर तसा तो अगदी सामान्य एकसुरी अाहे. हे मोठे-मोठे उंचवटे जगभरात घडलेल्या घटनांचे पडसाद अाहेत. अात्ताच झालेली सार्वत्रिक निवडणूक, friendship day, गणेशोत्सव वगैरे, वगैरे. पण या सगळ्यांपलिकडे असं इथे काहीतरी दिसतं अाहे.” जाधव मनापासून प्रयत्न करत होते. त्यांची त्रेधातिरपिट लपली नव्हती. “या सगळ्या ठळक वैशिष्ठ्यांमागे अगदी सुक्ष्म पण प्रचंड नियमीत एक लहर दिसेल तुम्हाला.”
“म्हणजे तो एलियन अापलंच internet network वापरून माहिती पाठवतो अाहे?” जाधव.
“नाही. त्यापेक्षाही अतर्क्य. ही माहीतीची देवाण-घेवाण वाटत नाही. दुस-याच कुठल्या तरी गोष्टीचा परीणाम दिसतो अाहे.”… “श्वासोत्छवास! अाणि इतरही बरंच काही! पण अगदी नियमीत.”
“म्हणजे? काहीच कळत नाहीये.” जाधव काहीसे निराशच झाले होते.
“अहो, यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे तो एलियन अाजही मुंबईतच अाहे. अाणि दुसरी म्हणजे….” “ तो सिलिकॉनचा बनलेला अाहे.”
जाधव तोंड उघडणारच होते, “सांगतो. अापण मुलतः कार्बन या अणूचा वापर करून जीवनावश्यक मुलद्रव्ये बनवतो. अापली प्रथिने, DNA, संप्रेरके, अगदी अापली त्वचा अाणि अापण खातो ते अन्नसुद्धा मुळात कार्बनचंच बनलं अाहे. थोडक्यात काय तर अापण कार्बनचे बनले अाहोत अाणि हा कोण तो एलियन अाहे, तो मात्र सिलिकॉनचा बनला अाहे.”
“हे शक्य अाहे?”
“अगदी सहज नाही, पण अशक्यही नाही. कोणत्याही अणूचे रासायनिक गुणधर्म ठरवते ते म्हणजे त्याच्या केंद्रकाभोवती फिरणा-या इलेक्ट्रॉन्सची रचना. त्याचे संयुज म्हणजे सर्वात बाहेरील कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन्स. अाणि कार्बन अाणि सिलिकॉनमध्ये संयुज इलेक्ट्रॉन्सची संख्या एकच अाहे. त्यामुळे तत्त्वतः कार्बनपासून बनणारी बहूतेक सर्वच मुलद्रव्ये सिलिकॉनपासूनही बनू शकतात.”
“कमालीचं अाहे हे सगळं!”
“अाहे खरं. पण अापल्यालाही ही संकल्पना काही नविन नाही. अापणही चतुर, बुद्धीमान machines बनविण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करतोच अाहोत की. अापल्याकडचे robots ते हेच. पण खूपच नैसर्गिकही. अापल्याकडच्या artificial intelligence चं natural रुप. मेख एकच अाहे. संयुज इलेक्ट्रॉन्स वरवर जरी समान दिसत असले तरी या अणूंच्या अांतरीक कक्षांमधला फरक त्यांच्या इतर गुणधर्मांत स्पष्ट जाणवतात…. असो, याबद्दल नंतर कधीतरी. थोडक्यात काय, तर अापला एलियन ब-याच अंशी अापल्यासारखाच असला तरी थोड्याफार फरकाने तो फारच वेगळा अाहे.”
“अाणि या फरकाचा वापर करून त्याला शोधणं सोप्पं जाईल. बरोबर?”
“बरोब्बर! उदाहरणार्थ, या सापडलेल्या लहरींच्या अभ्यासातून एक गोष्ट सिद्ध होतेय. या एलियनची जीवनप्रक्रीया अापल्यापेक्षा ज्या पटीने हळूवार चालते अाहे त्यावरून हे सजिव ज्या ग्रहावर राहतात त्याचा एक दिवस पृथ्वीच्या सुमारे ४३ दिवसांएवढा असण्याची चांगलीच शक्यता अाहे. तसंच त्यांचं एक वर्ष अापल्या २० वर्षांएवढा असावा.”
“अाणि ते का बरं?” जाधव कान देऊन ऐकत होते. 
“कारण, सिलिकॉनपासून कार्बनची प्रतिसृष्टी बनायची असेल तर तसं अावश्यक तापमान अाणि वातावरणाची अावश्यकता अाहे. ते तसं नसल्यामुळेच पृथ्वीवर एकाला जिवनदान मिळालं अाणि दुस-याची माती झाली” जाधवांचा गोंधळलेला चेहरा पाहून श्रीधरने पुढे विषद केलं होतं, “अहो, अापल्याकडची माती बहुतांशी सिलीका म्हणजेच सिलिकॉनची बनली अाहे.”
जाधवांनी समजल्याची पोच दिली.
“ पृथ्वीवरच्या २० वर्षांएवढं दिर्घ वर्ष याचाच अर्थ हा ग्रह त्याच्या सुर्यापासून पृथ्वीच्या तुलनेत बराच लांब अाहे. तेथील तापमान पृथ्वीवरील तापमानापेक्षा बरंच कमी असणार हे अोघाने अालंच. त्यामुळे हा एलियन पृथ्वीवर मुक्त संचार तर करू शकेल, पण फारच कष्टाने.” 
“म्हणजे अापण वाळवंटात फिरताना अापली अवस्था होईल तसंच काहीतरी.” जाधव होत असलेल्या माहितीच्या वर्षावाने दमून गेले होते. तरी तितकेच प्रश्नही त्यांना भेडसावत होते, “पण मला एक शंका अाहे…. तुम्हाला अांतरजालावरून जसं हे सगळं समजलं, तसंच मुंबईतला या लहरींचा स्रोत अचूक शोधणं शक्य नाही का?”
“नाही! एक तर या लहरी एखाद्या संगणकामुळे तयार झालेल्या नाहीत अाणि त्यामुळे त्या विशिष्ट पथावर (route) संक्रमित होत नाहीत. दुसरी गोष्ट, इतकी सखोल माहिती सार्वजनिक data मध्ये उपलब्ध नसते. ती इतर मार्गांनी मिळवणं बेकायदेशीर ठरेल.”
“मग अाता?”
“अाता अापण एकच करायचं. मुंबईत निर्माण होणा-या सगळ्या घन कच-याचं, केस, विष्ठा, मलमुत्र जे काही मिळेल त्याचं सिलिकॉन विश्लेषण करायचं. कार्बन dating करतात तसं काहीसं सिलिकॉन डेटींग.”
“बापरेऽ!”
“हो. काम तसं जोखमीचं अाहे. पण खरंच असा कोणी एलियन जर आसपास वास्तव करत असेल तर असं करणं फार गरजेचं अाहे. तेव्हा चला. कामाला लागूया!” जाधवांसाठी दार उघडत श्रीधर म्हणाला होता. 
जाधव जाताच श्रीधरने A.C. चं तापमान परत पूर्ववत केलं होतं, “हे जाधव वाळवंटातच जन्मले होते बहूतेक”.



“ती मुलद्रव्ये प्रयोगशाळेत पाठवली अाहेत. पण अाता पुढे काय?” जाधव दारातून अात येत येतच बोलले.
“आशा करूया की त्यांच्या विघटन क्षमतेची माहीती उपयोगी पडेल. अाणि…”
“अाणि त्यावरून ती कधी उत्सर्जित झाली होती ते कळू शकेल.”, श्रीधरला मध्येच तोडत जाधव म्हणाले, “म्हणजेच तो एलीयन त्याठिकाणी कधी होता ते कळू शकेल. अाणि मग तो अाता कुठे असेल याचा अंदाज घेता येईल!” जाधवांची न्यायवैद्यकीय (forensics) विभागात कसलेला अनुभव वाखाणण्या जोगाच होता.
“ते तितकसं सोपं नाही. त्या मुलद्रव्यांचं कार्बन ऐवजी सिलिकॉन अाधारीत chemistry लक्षात घेता, पृथ्वीवरचं त्यांचं विघटन फार क्लिष्ट प्रक्रिया ठरणार अाहे.”
इतरवेळी खरं तर श्रीधरला अाणखी बोलणं गरजेचं वाटलं नसतं, पण जाधव हा त्याच्या अाणि बाह्य जगातला एकमेव दुवा असल्याने त्यांना व्यवस्थित समजणं अत्यंत अावश्यक होतं. “माझ्या अंदाजाप्रमाणे“, श्रीधर संख्याशास्त्रातही निष्णात होता हे त्याच्या बेभरवशाच्या अचूकतेतून (non-confirming preciseness) अगदी कोणालाही लक्षात अालं असतं, “ तेथील जीवन सिलिकॉनचा पाया म्हणून वापर करत असल्याने, त्यांच्या विघटन गतिवरून त्या उत्सर्जनाची वेळ समजणं फार कठीण झालं नसतं, पण ते त्यांच्या ग्रहावर. इथे पृथ्वीवर विघटन करणारे सुक्ष्मजीव अापल्या जैवशृंखलेचा एक भाग अाहेत. त्या एलीअनच्या मलातून त्याच्या बरोबर अालेले त्याच्या शरीरातील काही सुक्ष्मजीव पडले असतील, तर अाणि तरच अापल्याला योग्य तो अंदाज बांधणं शक्य होईल. ज्याप्रमाणे अापल्या शरीरप्रक्रियांच्या सुरळीत कार्यप्रणालीसाठी काही किमान सुक्ष्मजीव अावश्यक असतात, त्याप्रमाणे ते त्यांना ही लागत असणार. अाणि तो अाजही जिवंत असेल तर त्याच्या विष्ठेत असे सुक्ष्मजीव मिळणं अगदी स्वाभाविक अाहे.”


जाधव श्रीधरच्या बुद्धीमत्तेने कधीही यापेक्षा कमी भारावून गेले नव्हते. जवळजवळ कधीही घराबाहेर न पडणारा, कोणाच्याही संपर्कात नसलेला हा माणूनघाणा प्राणी केवळ त्याच्या संगणकावर आकडेमोड करतो काय, अाणि त्याच्या अमर्यादीत बुद्धिमत्तेच्या जोरावर अशक्यप्राय वाटणा-या cases सोडवतो काय, जाधवांना सगळंच कल्पनातीत होतं. श्रीधरबद्दल जाधवांसारख्या मुरलेल्या पोलिसालाही फार माहीती नव्हती. त्यांच्यासाठी तो माणूस त्याच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी अचानक उद्भवला होता. जणू प्रकटच झाला होता. 


जाधवांना एका रात्री त्यांच्या एका मित्राचा फोन अाला होता. वरळी सी-लिंकवरती एक अज्ञात इसम जखमी अवस्थेत सापडला होता. डोक्याला भली मोठी जखम झाली होती. त्याच्या शारिरीक अांतर-प्रक्रियांची गती प्रमाणाबाहेर वाढली होती. श्वासोत्छ्वास बहूदा थांबलाच होता, पण डॉक्टरांच्या मते तो केवळ अनियमित झाला होता अाणि तो माणूस अजूनही जिवंत होता. बराच काळ डॉक्टरांचे सारे प्रयत्न अयश्वीच ठरत होते. अखेरीस जेव्हा खोलीचे तापमान दहा अंश सेल्सियसपर्यंत खाली अाणले, तेव्हा कुठे त्याची अवस्था स्थिरावली. पूढे शुद्धीवर अाला खरा, पण अगदी नव्या को-या स्मृतीसहीत. तो तिथे कसा अाला हेदेखील त्या बिचा-याला अाठवत नव्हते. दिड वर्षांहूनही अधिक काळ लोटला या घटनेला. ही अपघताती case शेवटपर्यंत काही solve झाली नाही, पण जाधवांच्या हाती मात्र एक हुकमी एक्का लागला. गेल्या दिड वर्षांच्या काळात त्या दोघांनी मिळून तब्बल बाविस cases तडीस नेल्या होत्या.


“असो. पण जाधव एक सांगा, हा साठा मिळाला कुठे?”
“कुठे मिळाला असेल असं वाटतं तुम्हाला?”
श्रीधरला फार डोकं खपवावं असं वाटलं नसावं. मग जाधवांनीच उकलभेद केला, “इथून फार लांब नाही. घाटकोपर sewage outlet च्या एक किलोमीटर अलिकडे एका manhole मध्ये सापडला.”
“यावरून अाम्ही त्या एलियनचं location मुंबईच्या सात sewage plan zones पैकी एकापुरती मर्यादीत करू शकलो अाहे.”
“मस्तच!”
“श्रीधरजी मजेची गोष्ट म्हणजे तुमचं घरही याच झोनमध्ये येतं अाहे! म्हणजे तुम्हीही एक suspect होता”, जाधव रांगडे हसत म्हणाले.
“हं. अाणि तुमचही जाधवसाहेब!… तेव्हा सांभाळून.”
“मस्करीचा भाग सोडा. पण श्रीधरजी, काम अजूनही जिकरीचं अाहे. कारण धारावीचं exhaust ही याच outlet ला येतं.”
“हं… पण तरीही, अापण खूपच मजल मारली म्हणायला हवं. अाता एक काम करा. घाटकोपर sewage क्षेत्रात प्रत्येक जोडणीला outlet च्या मुखाच्या विरुद्ध दिशेने monitor करायला लागू. मुखापासून सुरुवात केली तर जास्त लवकर कळेल अाणि कामही कमी करावं लागेल.”
“तशा सुचना अाधीच दिल्या अाहेत मी. पण अंदाजे किती वेळ लागेल असं वाटतं तुम्हाला?”
“४३! ४३ ही संख्या अापला परवलीचा शब्द अाहे. नक्की नाही सांगता येणार. कदाचित दिड महिन्यातच दुसरा साठा अशा एखाद्या कमी गर्दीच्या ठिकाणी गवसेल की लगेल सांगता येईल, किंवा कदाचित अाणखी बराच वेळ शोधत फिरावं लागेल.”
“तो एलियन अापली वाट पाहून निघून जायच्या अात अापण त्याच्यापर्यंत पोहोचलेलंच बरं”
“पोहोचायलाच हवं, जाधव. अाता इतक्याजवळ येऊन अपयश येता कामा नये अापल्याला. तो एलियन अाहे तिथेच थांबून राहीलाच पाहीजे.” एखादं कोडं सुटतानाची श्रीधरची अातुरता जाधवांना नविन नव्हती.
“ठिक अाहे तर, जाधव. मला कळवत राहा!” श्रीधर दाराकडे वळत म्हणाला.



दार लावतानाच श्रीधरच्या डोक्यात पुढच्या कार्यप्रणालीची अाखणी सुरू झाली होती. विचारात मग्न तो एका जागी स्तब्ध उभा राहीला. मनात विचार करतानाही हातवारे करण्याची त्याला सवय होती. इतक्यात एक भली मोठी जांभई अाली म्हणून त्याने समोर भिंतीवर टांगलेल्या घड्याळ्याकडे पाहीलं. रात्रीचे अाठ वाजले होते. सुर्य कधीच मावळला होता. श्रीधरने टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेल्या कागदांवरून नजर फिरवली. अाज आणखी काम करण्याची त्याची इच्छा नव्हती. बाजूला पडलेल्या संगणकाच्या पटलावर एक संकेत झळकत होता. श्रीधरची गोळ्या घ्यायची वेळ झाली होती. 


अपघातानंतर अाजतागायत पूर्ववत झालं नव्हतं असं काही असेल तर ते म्हणजे हा, जीवघेणा निद्रानाश. डॉक्टरांनी sedatives लिहून दिल्या होत्या, त्यावर भागत होतं कसंबसं. श्रीधरने कपाटातल्या गोळ्या काढून हातावर घेतल्या त्या पुन्हा एक जांभई देत देतच.
“अाज पुन्हा त्या दिवसांपैकी एक दिसतो अाहे!” 
इतर रात्री गोळ्या घेऊनही बरेचदा नीटशी झोप येत नसे. पण मधूनच एखादे दिवशी प्रचंड झोप यायची. इतकी की काही वेळा अंथरूणात शिरायचाही धीर होत नसे. मग पुढचे काही दिवस अंग जडावलेलंच राहायचं. सुरुवातीला श्रीधरने लक्ष दिलं नाही. पण अाजची ही दहावी वेळ होती. श्रीधरला लक्षात होतं, कारण तिस-यांदा घडल्यापासूनच त्याने नोंदी ठेवायला सुरुवात केली होती. डोळे मेहनतीने विस्फारत त्याने संगणकाकडे धाव घेतली. गेल्या नऊ नोंदी अाता अनुमान काढण्यासाठी पुरेशा होत्या. लगोलग त्याने काही अाकडेमोड केली. संगणकाच्या पटलावर नाचणा-या संख्येने तो गार पडला होता….. ४३.३ ± ०.४ … पुर्णांकात ४३!


“म्हणजे? म्हणजे मी? म्हणजे मीच तो…?” श्रीधरभोवती त्याचं घर जणू घिरट्याच घालू लागलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर नाचत होती, ती चौकट. त्याच्या घराची चौकट! त्याला बाहेरच्या जगापासून विलग करणारी, बंदीस्त करणारी चौकट!


We place a spherical cage in the desert. enter it and lock it from inside. We then perform an (geometrical) inversion with respect to the cage. Now, the lion is inside and we are outside the cage. 
- (Mathematical methods for) How to catch a lion 

Wednesday, June 25, 2014

भूक

ती भर उन्हातून झपझप पावलं टाकत चालली होती. अनवाणी. डोळ्याभोवती मिठाची वर्तुळं दाटली होती. इतरवेळी रस्त्यातल्या कोणालाही तिची सहज कीव आली असती. मग एखाद्या माऊलीने तिला अगदी तुडुंब भरलेल्या गर्दीतूनही पाटीच्या आडोशाला बोलवून "कुठं ग अशी वणवण फिरतेस? शाळेला सुट्टी असेल तर घरी बसावं, आया-बाप्यांना मदत करावी. तर तुझ्या पायाला ही अशी भिंगरी चिकटलेली" म्हणून विचारपूस केली असती. पण आताशा तिलाही स्वतःच्या वेगळेपणाची जाणिव होऊ लागली होती. पूर्वी सकाळी डोकावणार्‌या कोवळ्या कवडशाचाही ती मनापासून तिरस्कार करत असे. पण आता, आणि विशेषतः आज एका पायाचा ओलसर ठसा पुढील पावलागणिक पिऊन टाकणारा ऊन्हाळाही तिच्या नजरेत येत नव्हता. नजरेला भारून टाकणारं एक मृगजळ तिच्यासाठी आसुसलं होतं... तिची वाट पहात होतं.

पूर्वी ती कधी अशी रडायला लागली की बाकी कोणी करो ना करो तिचा मन्या काका मात्र कायम तिला जवळ घ्यायचा. तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा, पाठीवर थोपटायचा, पापे घ्यायचा, आणि मग हातभर लांबीची चॉकलेट द्यायचा. तिला नेहमी वाटायचं, "खरंच! किती प्रेमळ आहे काका. माझी किती काळजी घेतो. उगाच नाही, घरी मी एकटी असले, तर मला भिती वाटेल म्हणून लगेच अगदी शेजारच्या घरी रहात असला तरी इथे येतो. माझी सोबत करतो." 

पण आज तिचा मन्याकाका सुद्धा नव्हता. खरं तर कोणीच नव्हतं. आई-बाबाही!

एक दिवस खेळता खेळता तिला चक्कर येऊन पडली। पुढचं काय ते तिलाही निटसं आठवत नाही. अचानक जाग आली तेव्हा घरभर अंधार पसरला होता. आई अस्ताव्यस्त रडत होती. बाबा उशाशी वाट बघत बसला होता. छताकडे बघत. तिने उठून बाबाला मिठी मारली, तशी बाबाने एखाद्या वाघासारखी डरकाळी फोडत ही हाणलीन तिच्या पाठीत... त्यानंतर ती फक्त "बाबा, बाबा" म्हणत घरभर मार चुकवत पळत राहीली. शेवटी मन्याकाका आलाच. पण यावेळी तो बाबाशी बोलला काहीतरी. बराच वेळ. आणि मग तिला स्कुटरीवर मागे बसवून रात्रीच्या अंधारातच निघाला. बरीच वळणं, आड-वळणं घेत कुठल्याश्या मंदीरात आला. नविनच कुठल्यातरी. "उगाचच कुठे काही बोलू नको. याद राख!" म्हणाला आणि निघून गेला. तो आलाच नाही परत.

या गावातली लोकं तिच्या ओळखीची भाषा बोलायचे, पण तिला काहीच समजायचं नाही. पुढे जसे दिवसावर दिवस चढत गेले, तशी तिची तीही गरज नाहीशी झाली. कारण 'हल्‌ हल्‌' शिवाय इतर काही ऐकूच येईनासं झालं. दिवस दिवस उपाशी रहायचं आणि अवचित कोणी जाता येता टाकलाच एखादा रुपया, एखादा लाडू, किंवा कधीतरी नुसताच चूरा खाऊन झोपायचं. त्यातही कधीमधी आसपासची मुलं "तू इथली नाही...", "जा... जा..." असं काहीतरी म्हणत दिलेलं हिसकावून घ्यायची. सुरुवातीला 'आई, आई' करत अख्खा गाव पालथा घालून झाला, पण ओळखीची एक खूण दिसायची नाही. नंतर नंतर रडण्यानेही तिला सोडून दिलं. दिवसभरच्या वणवण फिरण्याने आणि पोटात अन्नाचा तुकडा नाही. मग मधूनच तिला वरचेवर चक्कर येऊ लागली. उलट्यांचा त्रास सुरु झाला आणि अशक्तपणा जाणवू लागला. उठूनउठून घरच्या कोंबडीच्या रस्श्याची आणि बोरणआळीतल्या चिंचेची उबळ येऊ लागली.

आणि मग अचानक वाढत्या थकव्याविपरीत शरीर फळू लागलं. पूर्वी जे बापे प्रसाद द्यायला जवळ येत ते दुरुनच परतू लागले आणि बाया एकमेकींत "कसं काय कोण जाणे?" कुजबुजत चार आणे जास्त टाकू लागल्या.

आताआताशा चालणंही अवघड होऊन बसलं होतं. अशक्तपणामुळे पोटही मध्येच डुचमळून, पिळवटून निघायचं. असं वाटायचं की आतले अवयव, खल्लेले पदार्थ निखळून पडताहेत. एकमेकांवर आदळताहेत. एक दिवस हौदातलं पाणी पिताना असाच आचका बसला आणि तोल जाऊन खालीच पडली ती.

शुद्ध आली तेव्हा मंदीराबाहेरच्या झुडूपांमध्ये कच-याच्या ढिगा-यात असल्याची जाणिव झाली. खुप मेहनतीने उठली तेव्हा शेजारी एक छोटंसं बाळही कोणीतरी टाकून दिलेलं दिसलं. तिच्यासारखीच कोणीतरी असणार ती! काहीतरी मस्ती केली असणार. आणि म्हणून आईबाबाने केली असेल शिक्षा... पण ती खुष होती... कारण, आता तिला एक मस्त मैत्रिण मिळाली होती. अगदी तिच्या 'छकुली' सारखी. 

कित्ती वेळ खेळायची एकटीच ती छकुलीशी. अगदी आई धपाटा मारून नेईपर्यंत. जातानासुद्धा तिच्या छकुलीची जाला ठरलेली... इतर खेळण्यांपेक्षा वेगळी.... गादीवर!

पण ही छकुली मात्र वेगळी होती. मऊमऊ हात, छोटे छोटे केस... तिला हात लावला मात्र तशी ती रडायलाच लागली. आणि मग ते वाढतच गेलं... खूपच!... तेव्हाशी तिच्या लक्षात आलं... भूक!... भूक लागली असेल. लागलीच ती उठून समोरच्या दुकानाच्या दिशेने झेपावली खरी, पण लगेच भोवळ येऊन खाली पडली... उठली तेव्हा छकुली शांत झोपली होती. "झोपली असेल बिचारी"... "पण उठल्यावर पुन्हा भूक लागली तर?"...

"काका, एकच...", "निदान एक गोळी तरी द्या...", "एक्कच...", "मला नाही, माझ्या छकुलीला...",... "अक्का टाकू नको ना. मला दे!..." "अक्का... अक्का..." करत करत गावभर हिंडली. तिलाही कळेना, मधल्या काळात चांगल्या वागणा-या बायाही परत पूर्वीसारखं हुडूत्‌ हुडूत्‌ का करू लागल्या ते. शेवटी एका घराबाहेर पडलेला एक भाकरीचा तुकडा गावला. खारट सुजल्या डोळ्यांमध्ये एक चमक आली.

मध्यान्ह होती. कोणी पहूडलं होतं, कोणी नुसतंच विसावत होतं, कुठे गप्पाटप्पा रंगल्या होत्या, गुरं सावलीला पांगली होती. ती मात्र वा-यासारखी गल्लीगल्लीतून वळत मंदिराकडे झेपावत होती.

छकुली अजून झोपलीच होती. ती शेजारीच बसून राहीली. डोळा लागला तिचा. जाग आली तेव्हा पोटाची आतडी पिळवटली होती. हातातला भाकरीचा तुकडा अलगद तोंडाकडे वळला... "नाही!... नाही!" म्हणत तिने तो खाली टाकला. परत उचलला. "थोडंसच.".... "नाही! नको... मग छकुली काय खाईल?".... नंतर कितीवेळ त्या मांडीवरल्या हातातल्या तुकड्याकडे एकटक पहात बसली कोणास ठाऊक.

जाग आली ती हाताला बसलेल्या हिसक्यामूळे. हातात तुकडा नव्हता... कसा असणार? तो समोरच्या झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीत होता... ती सैरभैर झाली. हूं हूं करत धावली. "दे... दे...", "दे ना रे..." म्हणत... शेवटी थबकून बसली... रडणं काही आवरत नव्हतं.... "छकुलीचा तुकडा होता!"

"छकुली.... छकुली... आता तू काय खाणार गं? ... बघ ना कसा दुष्ट आहे... छकुली... बोल ना, छकुली... उठ ना गं... उठ ना... मलाही भूक लागलीय गं.... भूक.... भूक..."

पण, तिला कुठे कळायला.... की एका भूकेतून जन्माला आलेला तो जीव दुस-या भूकेने कधीच खाऊन संपवला होता!

Friday, November 19, 2010

ती आणि तिचा तो

प्रिय ती,

दुस-या दिवशी अंघोळ करताना चार केस जास्त गळले, तेव्हा कुठे विश्वास बसला, की दिव्य याच सुपिक डोक्यातून उगवलं आहे. जादू आहे तुझ्यात... खरंच अजून काय काय घडवणार आहेस या दगडामधून?

जेव्हा सांगण्यासारखं माझ्याकडे खूप काही असतं,
तेव्हा मला तू आठवतेस...
आणि जेव्हा बोलण्यासाठी मला शब्दही परके होतात,
तेव्हाही मी तुलाच शोधत असतो...

अवतिभवती पसरलेल्या गर्द एकटेपणात,
तूच भरून राहिलेली असतेस...
आणि अंधाराने मिटलेल्या एकांत वर्दळीत,
तूच कशी मला हात देतेस ?

जेव्हा माझ्यातल्या मला माझा विसर पडतो,
तेव्हा तुझ्यातल्या मला तू आकार देतेस...
आणि तुझ्यातल्या माझ्या साकार अस्तित्वाला,
माझ्यातल्या तुझ्यात विसरून टाकतेस

माझा मी तुझी तू म्हणता म्हणता कशी अलगद,
माझ्या तुला तुझा मी जोडून टाकतेस?
आणि, सतत तुला माझी करत बसलेल्या मला,
तुच माझि होऊन किनारा दाखवतेस.

माझ्या काचेच्या हृदयावर उमटलेला तुझा एक स्पर्श,
दिवसेंदिवस ठळक होत जातो अाहे...
त्याला कधीच पुसून टाकू नकोस...
पुसलास कधी चुकून तर,
काचांच्या ढिगा-यात त्या माझं हृदय शोधू नकोस...

तुझाच,
तो

Saturday, May 22, 2010

संसर्ग

विज्ञानाच्या किंवा डॉक्टरकीच्या कुठल्याही पुस्तकात उल्लेखही नसलेल्या काही तात्कालिक संसर्गजन्य साथींचा ऊहापोह!

गिरगावातल्या आपल्या चाळीचा दुसरा मजला पायावेगळा करत तो त्याच्या खोलीकडे झेपावतो आणि त्याच्या चेह-यावर संदिग्ध भावनांचं जाळं पसरूलागतं. एरवी चाळीच्या घरांना दरावाज्याची पाचपोच असतेच कुठे म्हणा. पण आजचा प्रसंग कहीतरी वेगळेच संकेत देत असतो. दाराभोवती जमलेल्याघोळक्यातून वाट काढत तो आत येतो. समोरच्या बाजेवर नानूआजी त्याच्या बायकोला धीर देत म्हणत असतात, " मन घट्ट कर, सरस्वती! असे प्रसंगयायचेच". त्याची बायकोही एखाद्या संगित-मैफिलीतल्या पायिक श्रोत्याप्रमाणे मुसमुसुन दाद देते. त्याच्या शीरेवरचे ताण क्षणाक्षणाला अधिकाधिकतिक्ष्ण होत जातात. एवढ्यातच, शेजारचे देसाई त्याच्या खांद्यावर थोपटतात, " कपाटाचं कळलं... वाईट झालं".
"हं...", अभावितपणे उत्तरलेल्या त्याला हळूहळू सगळा प्रकार लक्षात येऊ लागतो आणि त्याला 'तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडणे' की तसच काहीसं होऊ लागतं. तो जवळजवळ खेकसतोच,
"ओ नानूआजी... चला! काही झालं नाहीये" ...."आणि काय गं? तू कशाला भोकाड पसरलं आहेस?".
"अहो भोकाड कुठे, पण हे सगळे इतकं दु:ख करायला लागले, मग मलाही रडू आलं"

आता एका साध्या कपाटावरही कुटुंबतल्या सदस्यागणिक प्रेम करणा-या संस्कृतीविषेशाला सादर गृहीत धरलं, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे, रडणं हा बायकांचा संसर्गजन्य रोग आहे.

sisterly relation वर एक समर्पक कथा ऐकल्याचे आठवते: एकदा सीता-गीता जोडगोळीला रडताना पाहून झंप्याने सीतेला विचारले, "का गं बाई, का रडतेस?". त्यावर सीता उत्तरली, "मला नक्की नाही माहिती, पण ही रडते, म्हणून मी रडते". त्यांच्यातील भगिनीप्रेमाने गहिवरलेल्या झंप्याने मग गीतेला कारण विचारलं. "मी?... मी कुठं रडते आहे. मघापासून काहितरी डोळ्यात खुपतं आहे झालं. तर मला मदत करायची सोडून ही बया माझी नक्कल करून चिडवते आहे", गीता त्रासिक आवाजात खेकसली. यावेळी झंप्याच्या चेह-यावर बद्धकोष्ट झालेल्या भस्म्यासारखे भाव न उमटतील तरच नवल! आता हा सीतेचा मोठेपणा आणि गीतेचा कोतेपणा असा सरळ सोपा अर्थ लावण्याची घाई कराल, तर पूढच्या वेळेस सीतेची गीता आणि गीतेची सीता झालेली दिसेल. एकाच वेळी हे असं परस्पर-व्यस्त पण तंतोतंत पूरक वागणं फक्त दोन बहिणींनाच जमू शकतं, म्हणून हे नातं विलक्षण मोलाचं. तिथे तिसरा नेहमी ति-हाईतच असतो. असो! महत्वाचं काय तर रडण्याचा संसर्ग!

अरे, समोरच्याने दिली म्हणून आपल्याला यायला 'रडणं' म्हणजे काय जांभई आहे का? पण 'जांभई परवडली' म्हणायला लावणारे 'रुंदन'-संसर्गाचे विक्रम हा - हा म्हणता Indian Idol किंवा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'च्या elimination round मध्ये सर्रास दिवसामाजी मोडीत निघतात.

रडणं हा बायकांचा संसर्गजन्य रोग आहे. पण याचा अर्थ पुरुष सोवऴ्यातलं जीवन जगतात असं मुळीच नाही. पुरुषांकडे बायकांएवढी consistency नसते एवढंच. नाही तर 'टॉक टॉक' करीत चौथ्या माळ्यापर्यंत आपल्या आगमनाची बातमी पोहोचवणारे खबरी किंवा सहनशीलता, प्रतिकारशक्ती सारख्या तद्धन डॉक्टरी गैरसमजांना लिलया धुडकावणारे ' six-pacs' चे उपासक, वगैरेंसारखे अल्पकालीन संसर्ग-विटाळ बरेच सांगता येतील. पण एकूण काय, तर संसर्गाच्या बाबतीतही निष्ठेचं वाण पुन्हा बाईच्याच पदरी. पुरूषाची झोळी इथेही रीकामीच!

हं, आता जसे कही संसर्ग लिंग-विशिष्ठ असतात, तसे काही लिंग, वचन यांच्या मर्यादा भेदून पसरलेले दिसतात. उदाहरणार्थ, प्रेमात पडणं! अगदी काल-परवापर्यंत एकावेळी एकट्या-दुकट्या (फार फार तर द्विभुज 'त्रिकोणी' संबंधा) पुरता मर्यादीत असलेला हा वैयक्तिक खेळ आजकाल सर्रास सांघिक पातळीवर खेळला जातो. एकाच रूपगर्वितेच्या अदांपुढे हळहळताना, विव्हळताना दिसणा-या वर्गाचं (किंवा काही वेळेस अख्ख्या संस्थेचंच) किंवा मग एकाच वेळी आजुबाजूला असलेल्या प्रत्येक मुलीच्या साधनेत रममाण झालेल्या साधकाचं दर्शन होणं आता तितकसं दुर्मिळ राहीलेलं नाही. बरं, हे झालं या रोगाच्या 'वचन'-व्यापकतेबाबत. याच्या 'लिंग' विलासी गुणांबद्दल सामाजिक पातळीवर मतं उधळणं हा पूरोगामी वृत्तीचे द्योतक मानण्याचा संकेत आहे. त्यामुळे या मुख्यत्त्वे करून वैचारीक-संसर्गातून जन्माला आलेल्या आणि कालौघात तथाकथित बुद्धीवादींच्या अथक्-परिश्रमातून कोकणस्थ ब्राह्मणांच्या आमटी वरताण पाणीदार बनलेल्या विषयावर आता अधिक बोलणे 'नळ' गे (की नलगे?, नल गे??, न लगे???... की असंच कहीतरी)!
असो! तर प्रेमात पडणे हा सद्याचा hot संसर्ग आहे.... पण त्याविषयी आणखी बोलणे नको. कारण असं म्हणतात, की हा रोग बोलण्यातून फैलावतो, हसण्यातून रुजतो आणि सुरुवातीला जरी साथीने पसरत असला, तरी एकदा जडल्यावर मात्र दुराव्यातून आणखीनच बळावतो. त्याहीपेक्षा, गंमत म्हणजे पु. ल. देशपंडे यांच्या " जल - शृंखला" योगानुसार या रोगाची लक्षणं डॉक्टरला सोडून इतर सगळ्यांना अगदी सहज जाणवतात!

अशा या संसर्गजन्य रोगराईतच आजपर्यंत 'शिक्षण' नामक उद्योगवृक्ष आपली पाळंमूळं घट्ट रोवून वधारत आला आहे. एकामागोमाग एक असे 'engineering', 'medicine', 'C.A.', 'M.B.A.' नावाचे एकापेक्षा एक बलवत्तर साथीचे रोग पसरतात आणि नुकतेच वयात आलेले कोवळे जीव पटापट् बळीपडत जातात. या रोगाचं वैशिष्ट्य म्हणजे या रोगाची लागण न झालेल्या अथवा यातून सुटका झालेल्यांना रुग्ण असे संबोधिण्याची प्रथा आहे. चांगली गोष्ट अशी, की अशा रुग्णांसाठी सरकारी अनुदानातून प्रथितयश संस्थांमध्ये उपचार उपलब्ध आहेत. TIFR, IISc, HRI, TISS, IGIDR ही यापैकीच काहीसंस्थांची नावं. साधारणत: ४-५ वर्षांच्या उपचारानंतर हे रुग्ण बरे होवून घरी जावू शकतात. पण या उपचारालाही दाद देणा-यांची मात्र मग बाहेर MIT, Harvard नामक US-based संस्थामध्ये रवानगी करावी लागते. असाध्य गोष्टी साध्य करण्याची किमया US ला गेल्याशिवाय घडत नाही हासुद्धा एक कालपरत्त्वे बळावलेला सांसर्गीक समज आहे, हे तुर्तास दुर्लक्षितच ठेवू.
हं... सध्या मला blog लिहिण्याच्या एका नवीन संसर्गाने पछाडलं आहे म्हणतात. म्हणजे हल्ली मी मनातल्यामनात की कसं ते विचार न करता, ब्लॉगातल्या ब्लॉगात करतो. विशेष म्हणजे या रोगाचं निदान फक्त act-n-response प्रक्रियेनेच होते. म्हणजे, थोडक्यात सांगायचे तर या रोगावर लस शोधण-या डॉक्टरला स्वत: ब्लॉगलिहिण्याचं ' जंतुकीकरण' टोचून घ्यावं लागतं. अर्थात, लोक काय म्हणतात हे मी तितकसं मनावर घेत नाही. माझ्या मते मी शंभर टक्के normal आहे. तुम्हालाही तसच वाटतं ना?

Monday, April 19, 2010

माझं काही खरं नाही...

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

मी डबा आणला नाही म्हणून ती आपला डबा तसाच परत घरी नेते, आणि मी मात्र तिच्या वेंधळेपणाच्या गोष्टी मित्रांत फुलवतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

कुत्रं अंगावर आलं म्हणून
मैत्रिणींच्या गर्दीतही ती फक्त मलाच बिलगते, आणि मी मात्र भोवतालच्या हशात मिसळत 'घाबरट' म्हणून तिलाच धपाटा देतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

तिने तोडलेल्या दाराचं हॅण्डल दुरुस्त केलं म्हणून ती अभिमानानं माझी पाठ थोपटते, आणि मी मात्र tv game मध्ये disturb केलं म्हणून तिच्यावरच खेकसतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

मी सांगावं म्हणून ती एकच गणित परत परत चुकवते, आणि मी मात्र S. L. Loney चा reference देवून मोकळा होतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

Chemistry च्या practical ला ती सारखी सारखी माझ्या opposite टेबलावरच्या मैत्रिणीपाशी घुटमळते, आणि मी मात्र confirmation test चे निकाल नाचवत lab बाहेर पळण्याचे plans रचत असतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

पहिल्या पावसात ओलेत्या अंगाची थरथर ती माझ्या स्पर्शाने पांगवते, आणि मी मात्र आकाशातल्याइंद्रधनुष्याचं physics समजावून सांगत राहतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

कानपूरला निघालेल्या पुष्पक express ला तीचे हिरमुसले हात पून्हापून्हा टाटा करतात, आणि मी मात्र एकएक स्टेशन मागे टाकत पुढील career ची स्वप्न रंगवण्यात मग्न असतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

अचानक... ब-याच वर्षांनी मला तिची आठवण होते. google सर्च करत मी तिच्या college च्या फोनपर्यंत पोहोचतो आणि तिची ओळख काढत चौकशी करतो...

ती गेलेली असते... सोडून... पुढचा कुठलाही पत्ता न देता... कधीच परत न येण्यासाठी!

आणि मी मात्र श्वेताच्या मृत्युदुताला, त्या निर्जीव receiver ला हातात तसाच धरुन असतो.... सजीव दगडासारखा

माझं काही खरं...

वाचन व्या..दंगेखोर

-->
"अरेऽऽ प्रसंगी रस्त्यावरच्या दिव्याखाली वाचन करुन दिवस काढले आहेत!", असं म्हणणा-या भल्याभल्या वाचनप्रेमींना फेंफरं आणतील असे व्यासंगी मुंबईच्या रेल्वे गाड्यांतून सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळांत प्रवास करताना भेटतात. एकाचा डावा खांदा दुस-याच्या उजव्या काखेत हरवेपर्यंत खच्चून भरलेल्या गर्दीत आणि आत येताना आपल्या मुख्य शरीराबरोबर आणलेले accessary अवयव अजूनही जवळपासच असतील आणि योग्यवेळी ते आपल्याबरोबरच बाहेर पडतीलच याची कुठलीही खात्री नसतानादेखील एखादा बहाद्दर हातात अठ्ठ्यात्तर ठिकाणी दुमडलेलं वर्तमानपत्र चाळण्यात मग्न असतो. त्याच्या आजुबाजूचे तिन-चार जण मग मिळेल त्या angle ने आणि लाभेल तेवढा perspective वापरत स्वतःची वाचन-तृष्णा शमविण्याचे सगळे प्रयत्न पणाला लावताना दिसतात.
स्वाभाविकपणे, तो म्होरक्या त्याच्या आवडी-निवडीला प्रामाणिक राहून स्वतःच्या वाचनवेगानुसार पानं उलट-पालट करत राहतो आणि त्याचे इतर आगंतुक वाचक-स्नेही आधीच्या अर्धवट वाचलेल्या मथळ्यातून पुढच्या मथळ्यात प्रवेश करत राहतात. सामान्यतः या बदलाला adjust/adopt होण्याची निसर्गदत्त क्षमता प्रत्येकातच असते. पण या उत्क्रांत-मेंदुच्या मोबदल्यात आपण किती मोठ्या मनोरंजनाला मुकलो आहोत हे पडताळण्यासाठी केलेला हा प्रयोग:
स्थळ: लोणावळा-पूणे लोकल
वृत्तपत्र: लोकमत, दिनांक १७ एप्रिल २०१० ची पूणे आवृत्ती
(सुसंगतीसाठी पान-बदलाचे संकेत दोन सलग स्वल्पविरामांनी ,, आयोजिले आहे, तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.)
"माझ्यावरील आरोप बिनबुडाचे" - शशी थरुर
परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांच्या राजिनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने लोकसभा राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना थरुर यांनी केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, " माझ्यावरील आरोप बिनबूडाचे आहेत,, मी पाकिस्तानची बहू नक्कीच नाही. मी केवळ शोएबची बीवी आहे. मी पाकिस्तानशी विवाह केलेला नाही; तर एका पुरुषाशी निकाह केलेला आहे. काही लोक या निकाहाला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना ते करु द्या".

मदरशात कुराण, बायबल, वेदाचे धडे
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद जिल्ह्यातील संगम नगरीच्या करेली भागात एका मदरशात कुराण, बायबल आणि वेदाचे धडे सोबतच दिले जातात. इस्लामिक एज्युकेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अखत्यारीत सुरु असलेल्या या मदरशाचा,, शोध घेण्यासाठी इस्रोच्या वरिष्ठ संशोधकांची उद्या थिरुवअनंतपूरम् येथे बैठक होत आहे. बैठकित या मोहिमेच्या अपयशाची कारणे शोधली जाणार आहेत

समाजाभिमुख गुलाबमामा
चाकणजवळील राणूबाई मळ्यातील मतदारसंघातून सतत २५ वर्षे निवडून येणारे गुलाबमामा लेंढघर सर्व परिचित आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची ३१ वर्षे साजरी करताना अनावश्यक खर्च टाळून त्या रकमेतून ३१ आदिवासी कुटुंबांना चादरी, त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके वाटप केले. ते नेहमी म्हणतात,, "भारत-पाक संबंध सुधारण्याच्या शक्यतेतूनच भुत्तोंची हत्या झाली आहे!".
(मधल्या काही वेळात नाटक-सिनेमे यांच्या जाहिराती, वधु-वर सुचकता अाणि सरकारी टेंडर्सनी भरलेली पाने वाचून वाचल्यासारखी फडफडतात... पण, त्यातूनही head-liners मात्र सुटत नाहीत.)

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्याचा छगन भुजबळ यांच्याकडून गौरव,, जेथे 'धन' तेथेच 'फन'

दुल्हेराजा आँफर! लग्न करताय? डोकं लढवा,, होमियोपॅथी वापरा, केस गळती थांबवा.

शहरात साखरेचा भाव तीस रुपये किलो...,, अनोळखी महिला ठार, ओळख पटविणा-यास,, जागा देणे आहे

सुरक्षित शहरे?
काही दिवसांपुर्वीपासून हिंजवडी, पिंपळेगुरव, मुंबई याठिकाणी विवाहितेवर, तरुणींवर बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत,, यावरुन शिक्षणक्षेत्रात चंगळवादाची परिसीमा गाठल्याचे दिसले. ही कृती अतिशय घृणास्पद आहे,, हा थकवा दूर करण्यासाठी विश्रांतीची गरज असते. किंबहूना शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुट्टी आवश्यकच आहे. मे महिन्याच्या सुटीच्या काळात त्यांच्यावर निवडणूका, जनगणना किंवा अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे लादू नयेत.

घरोघरी कचरा गोळा करणा-यांना पुणे महापालिकाच देणार,, कांदा-कोबीची पचडी
साहित्य: बारीक चोचवलेला कांदा, चिरलेला पांढरा कांदा, पाव वाटी ओला मटार, अर्धी वाटी ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल
कृती: ...