Tuesday, December 19, 2006

दर्भाचा कावळा

परतीचा प्रवास सुरू होतो आणि इतकावेळ तुंबुन राहिलेला थकवा शरिरावर झडप घालतो. सुरकुतलेला उत्साह, मातकटलेले कपडे, घामाने भिजलेले रुमाल आणि मधूनच आपल्या असण्याचा पुरावा नाकपुड्यांद्वारे पोहोचवणारे मोजे त्यांनी घेतलेल्या अनन्त आनंदोत्सवाचे गाणे आरवत असतात. एस. टी. चा लाल डबासुद्धा त्यांना स्वर्ग वाटू लागतो. शरिराने आणि मनाने झाल्या समाधानाची पोच केव्हाच दिलेली असते. आता फक्त घरी पोहोचण्याचा अवकाश.... कि इन्द्रियांत तुडुंब कोंबलेल्या आठवणी धरण तुटलेल्या नदीप्रमाणे मोकाट सुटणार असतात.

आसनावर बसल्या बसल्या त्यांचे चौकोनी संभाषण सुरु होते.... गेल्या दोन दिवसातले गोड अनुभव, नाविन्याचा हर्षोल्हास, घडलेले विनोद, झालेली फजिती यांची उजळणी सुरू होते. घरातून निघाल्यापासुन ते अगदी आत्ता गाडीत चढेपर्यंतचा इतिहास वाचला जातो...चाखला जातो! मध्येच कधीतरी उरलेल्या फरळाच्या पिशव्या बाहेर पडतात... रिकाम्या होतात. मग केव्हातरी वातावरण शमतं. बसने खाचखळग्यातुन जाताना दिलेल्या हिन्दोळ्यावरती झोपेचा लपंडाव सुरु होतो. अचानक कुठलासा स्टॅण्ड लागतो... चहाच्या फेऱ्या झडतात.... आणि कुठुनतरी त्यांचे शेवटच्या आसनावर लक्ष जाते..... तो जो पाचवा असतो, तो झोपलेला असतो.... एकटाच... उरलेल्या सीटवर सन्तुष्ट होवून.

बसमध्ये एकत्र चढलेल्या त्यांच्यात तो सुद्धा असतो... पण नात्यांच्या जंजाळात तो सगळ्यात मागे पडलेला असतो... त्याच्याही नकळत... सुरुवातीला दु:खी झालेला तो मग आलेल्या परिस्थितीला आपलसं करतो आणि समाधान मानतो... त्याच्या स्वत:च्या जगापुरता...

त्या चौघांनाही त्याची फारशी तमा नसते... उलट, त्याच्या एकलकोंड्या ध्यानावर त्यांना हसू येते... तो आपला असतो, म्हणुन ते हसु दाबायचं ही नसतं आणि मिरवायचं ही. त्यानेसुद्धा ते सोसायचं नसतं आणि भोगयचं ही नाही. आनंद, दु:ख यांच्यापलीकडे जाण्याची ती एक परिक्षा मानुन तिला सामोरं जायचं असतं.

आणि त्यात चुकलच कुठे हो? शेवटी त्याचं अस्तित्व वर्तुळच्या मध्यासारखे असते. परिघाशी एक अतुट नातं असतं. पण म्हणून त्याच्याशी जवळीक साधाण्याचा वेडेपणा करता येत नाही. तो एक दर्भाचा कावळा असतो. त्याचे आयुष्य खऱ्या कावळ्यांनंतर सुरू होते आणि पिंडाच्या स्पर्शाने मावळते. तेवढीच त्याची गरज... आणि तिच त्याची रया. घडाभर संसारात घडीभरही आयुष्य वाटेला आले नाही म्हणून रडण्यापेक्षा मिळालेल्या टिचभर वेळेत इतर कावळ्यांनी नाकारलेल्या पिंडाला शिवुन तिथे जमलेल्या असंख्य चेहऱ्यांवरचे समाधान टिपुन आपला अवतार त्याने आटोपता घ्यायचा असतो. "जिथे कमी तिथे आम्ही", हेच त्याचे ब्रिदवाक्य असते... विपुलतेत त्याला स्थान नसते!

प्रवास संपतो... इतकावेळ दाबुन ठेवलेली त्याची चर्या उफळुन वर येते... तो झपाझप पावले टाकत घर गाठतो.


संध्याकाळी ते सगळे एकत्र भेटतात... तो ही तिथेच असतो.... "घरि आल्यावर अंग दुखायला लागलं नाही?",पहिला.... "मी तर चक्क तास्भर आंघोळ केली... मस्त फ्रेश वाटतयं", दुसरी..... तिसरा मग आलेल्या संधीचा फायदा घेत त्याला विचारतो "घरि गेल्यावर मग सगळं ठिक ठाक झालं ना?"......

सगळ्याकडे पहात तो मग मन्द हसतो....दर्भाला पून्हा एकदा पालवि फुटलेली असते... पून्हा एकदा कावळा होण्यासाठी!

Thursday, October 12, 2006

(वि)चित्रवारी

काही दिवसांपूर्वी अमोल पालेकर दिग्दर्शित थांग पाहाण्याचा योग आला. प्रभात चित्र मंडळ यांच्यातर्फे ठाण्याच्या eternity mall मध्ये या खास अंकाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले चित्रपट आणि नंतर अमोल पालेकर, विजया मेहता, ऋषी देशपांडे, संध्या गोखले आदी चित्रपटाशी निगडीत मान्यवरांशी चर्चा असा तो एकूण कार्यक्रम होता.

सहाजिकच अशा या मराठमोळ्या कर्यक्रमाला उपस्थितीही तशीच मराठी बाण्याची असते हे वेगळं सांगायला नको. नेहमीप्रमाणे, एखाद्या मध्यमवर्गीय समाजाला शोभेल असे, आम्ही वेळेआधी पुरते अर्धा तास हजर झालेलो असतो. ( त्यात वेळेचं महत्त्व किती आणि दिलेल्या पासेसवर आसनक्रमांक नसल्याने योग्य जागा मिळविण्याची middle-class धडपड किती, हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नसतो... आणि तसे असले तरी, यात आमचा गुन्हा असा काहीच नसतो. कारण, बाकी सर्व जग जरी बदललं, तरी मराठी माणूस त्याच्या मध्यमवर्गीय गुणांना जागतो, हा निसर्गनियमच आहे. ) तसं उशीर होण्यासाठी आमच्यात स्त्रिलिंगी जोडव्यक्ति कोणीच नसते हेही कारण महत्त्वाचं! (कदाचित हाही एक मध्यमवर्गीय नियम ठरावा) आणि असं असुन सुद्धा बेलाला पाने तिनच या उक्तिप्रमाणे, तिथे पोहोचणारे आम्ही बहुदा शेवटचेच असतो.

ठरल्यावेळेपेक्षा चित्रपट फक्त अर्धा तास उशिरा सुरु होणार असतो. आणि त्यामुळे चित्रपटाआधीच्या काही घटिका आम्हाला अशा चहुकडून उधार मिळलेल्या क्षणांवर उजळाव्या लागतात. आम्ही आसनावर बसल्याबसल्या औत्सुक्यसुलभ हालचाली सुरु ठेवतो आणि आजुबाजुला व्यक्तिस्वातंत्र्याचे नवनवीन अविष्कार उलगडत जातात.

" गुजरते वहिनी, तुम्ही इकडे बसा"
"हे तुझं नेहेमीचंच आहे..."
" हि खुर्चीपण तुम्हीच घेतलीत... कमालच आहे!"
" अहो जरा खाली सरका ना, समोरचं दिसत नाही"
"अरे! काय म्हणता... आणि, परवा ब्रा. सं. च्या बैठकीला आला नाहीत... वसन्तराव काय झकास बोलले म्हणून सांगू "
" माझ्यासाठी एक popcorn "
"श्शी:!... गरज असेल तेव्हा याचा फोन कधी लागलाय?.... फेकून दे म्हणावं त्याला!"
"तरी घरातून निघताना दहावेळा विचारलं होत... आता बस तसाच, पिक्चर संपेपर्यंत!"
" अहो जरा A/C कमी करता येईल का?"
"यावेळी तरी mic ची व्यवस्था करा म्हणावं.... मागच्यावेळी काही ऐकुच येत नव्हतं.... "
"छे हो! ती कसली येतेयं.... तीला असले कौटुंबिक सिनेमे आवडत नाहीत"
"येताना दुध तापवत ठेवलं होतं... गॅस बंद केला होता का हो तुम्ही? "
"लास्ट रो... थर्ड चेअर..."
"एक्सक्युज मी.... "
"काय हो? ही परांजप्यांची चारु ना?....."
"अरे तू एक सीट तिकडे सरक, रेणुका तिथे बसेल... आणि विजयराव तुम्ही पलिकडे !"

अशा अनोळखी, पण तरीही अंगवळणी पडलेल्या कल्लोळात पहिली पंधरा-एक मिनिटे सहज सरतात. पुढची काही पडद्यावर सरकणाऱ्या जाहिरातींमध्ये जातात. अशा जाहिराती मध्यमवर्गीय माणसाने लक्ष देऊन पाहाव्यात जरूर, पण लक्षात मात्र ठेऊ नयेत. कारण, ज्याच्या जीवनाचा सारा ओलावा, त्या हमामच्या दोन वड्यांबरोबर फुकट मिळणाऱ्या तिसऱ्या वडीपुरता कसाबसा टिकतो, त्याला एका मर्सिडिज-बेन्झ बरोबर मिळणारा डबल-डोअर फ़्रिज काय झेपणार, कपाळ?

मधेच कुठेतरी आपल्या मुलाबरोबर खिशातले पैसे आणि चित्रपटाभोवतीचे मध्यांतर यांचे गणित सोडवणारे वडिल दिसतात, तर कुठेतरी कडेवरच्या रडणाऱ्या बाळापेक्षा आजुबाजुकडुन होणाऱ्या कुत्सित कटाक्षांनी कावरीबावरी झालेली आई नजरेत भरते. बाकी ठाणा-डोंबिवलीच्या मासळीबाजारातसुद्धा साखरझोपेत पेंगणारे गुटगुटीत बालक, मॉलच्या निरवं थंडाईत घुसल्याघुसल्या कसे काय जागे होते, हा एक यक्षप्रश्नच आहे.

तर अशा या असंख्य लाटांवरती हा (वि)चित्रानुभव हिंदोळत पुढे सरकतो आणि येणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबर नावेत उडणारे ते आठवणींचे चार-चार शिंतोडे आम्ही सहज टिपत राहतो. मग हळुच केव्हातरी पडद्याबाजुचं दार उघडतं, त्या दारातून व्यवस्थापक नावाचे कुणीतरी आत शिरते, झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करते, आणि चित्रपट सुरु होत असल्याची घोषणा करुन जाते. पण कमळाच्या पानांवरले मोती टिपणाऱ्या आम्हाला चिखलात पाय बुडल्याची तमा नसते.

पुढे मग पटलावरील चित्र धावू लागते, आणि इतकावेळ गोंगाटात भारंभार नटलेला जिवंतपणा मालवलेल्या दिव्यांबरोबर अंधारात विरून जातो. मग प्रत्येकजण वेगळा असतो.... ज्याचा-त्याचा असतो... पडद्यावरच्या निर्गुण सावल्या त्याला हळुहळु आपल्याशा वाटू लागतात आणि त्याचवेळी शेजारी बसलेला त्याचा सगुण सोबतीमात्र त्याला परका झालेला असतो.

Friday, October 06, 2006

सुमित्रा

लहानपणी म्हणे माझे लग्न ठरले होते. नाही नाही! हा काही बालविवाहाचा एखादा प्रसंग नाही.... तर ती माझी एक कल्पना होती... म्हणजे मला कोणीही मस्करीत काही विचारले, की माझे उत्तर तयार... आणि, माझ्या बायकोचे नाव "सुमित्रा" होते. आता हि कोण कुठली सुमित्रा, हे कदाचित त्या विश्वकर्म्यालाही ठाऊक नसावे बहुदा. एवढे मात्र नक्की, कि अशा नावाची व्यक्ति आमच्या सोसायटीतच काय पण माझ्या आठवणींच्या पंचक्रोशीतही दुरदुरपर्यंत कोणी नव्हती. बरे, हे काही माझ्या बायकोचे लग्नानंतरचे नाव होते, अशातलाही प्रकार तो नसावा, कारण जेथपर्यंत मला आठवते, हि सुमित्रा कुठेतरी आटपाट नगरीत मझ्यासाठी वसत असावी अशीच माझी भूमिका होती. तर थोडक्यात काय, SRK च्या एखाद्या चित्रपटाला शोभून उरावा असा तो एकूण घाट होता. ( म्हणजे माझा तत्कालिन बोबडेपणा (त...त...तोतरेपणा) अद्यकालिन SRK touch किती देऊ शकला असता हि बाब गौण मानण्याचा मोठेपणा दाखवू शकलात तरच!)

असो... तर ही सुमित्रा मला अजूनपर्यंत काही भेटलेली नाही. आणि आता चुकून-माकून समोर आलीच, तर तिचे स्वागतागत्यादी सोपस्कार पार पडतील अशी माझ्या मनाची तयारीही वाटत नाही. कारण, आजघडीला सुमित्रा नाव असलेली षोडशकन्या म्हणजे, पहाटे लवकर उठणारी, थोरामोठ्यांचा शुभाशिर्वाद आणि देवादिकांची षोडशोपचारे पूजाअर्चा घडल्याविना घोटभर पाणीही न पिणारी, डोक्यावर किमान अर्धा लिटर तेलाची उदकशांत घालून तो केशसंभार करकचून पिळून घेणारी, घरापासून कॉलेजात जाईपर्यंत नाकाचा मार्गिकेशी असलेला कोन जराही बदलू न देणारी आणि चुकून जर कोणी ओळख देण्याचे अवलक्षण घडवलेच, तर तेवढ्याच तिऱ्हाईतपणे चेहऱ्यावरच्या मुद्रीत हास्य नामक कोळिष्टकाने परतवणारी, किंवा त्याच्याही पुढे जावून एखाद्यच्या good morning वाचक अवमानाला "सुप्रभात" असा घरचा आहेर देत टोलवणारी, सकलगुणसंपन्न धर्माचारिणी एकमेवाद्वितीयाच माझ्या डोळ्यासमोर येते.

मग अशी ही सुमित्रा रोज वेळेवर कॉलेजात जाते. तिथे सामान्यतः एखाद्या कोपऱ्यात सापडणाऱ्या कट्टा नामक कर्मभुमी असलेल्या, आकाश हेच पांघरुण आणि धरणी म्हणजे पायघडी समजणाऱ्या आणि या दोहोंच्या मध्ये त्या विश्वेश्वराने निर्माण केलेल्या तितक्याच मौल्यवान विषमलिंगी विश्वचा आस्वाद डोळे भरभरुन लुटणाऱ्या, "मवाली" हि उपाधि degree म्हणून धारण केलेल्या शैक्षणिकदृष्ट्या निरुपद्रवी विद्यार्थिसमुहाला जातायेता शिव्यांचा रतीब घालते. आणि तिच्या भक्तांपैकी एखादा चुकून त्यांच्यापासून दहाएक मैलांच्या परिघातही आढळल्यास पुढील दोनएक तास "आपण कशासाठी कॉलेजात येतो, आपले आईवडिल आपल्याला इथे का पाठवतात, त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, प्रसंगी स्वतःच्या इच्छाआकांक्षांना कसे गालबोट लाववे लागते... वगैरे वगैरे" उपदेशाचे चार शब्द ऐकवते. या कर्यक्रमाच्या शेवटी "यापुढे असे झाल्यास" कोणत्या परिणामांना सामोरे जावे लगेल याची उजळणी करायलाही विसरत नाही.

या सुमित्रेला दर परिक्षेत न चुकता "पैकीच्यापैकी" मार्क कसे मिळतात, हिच्याकडेच प्राध्यापकाने अगदी आडवळणाला जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा तितक्याच सहजपणे कशी सापडतात, तीला भाषेसारख्या अवजड-बोजड विषयांत रुची कुठून आणि कशी निर्माण होते आणि आमच्यासारख्या पामरांच्या प्रकृतिला वर्ज्य असलेले अलंकारिक शब्द हिच्या निबंधात "पैशाला पन्नास" मिळत असल्यासारखे कसे काय मुक्तापणे विहरत असतात, वक्तृत्व स्पर्धेत हिचे भाषण सुरु होण्यापूर्वीच हिचा पहिल्या क्रमांकाचे परितोषिक कसे काय मिळते आणि याच महात्म्याच्या अवतीभवती वसलेल्या इतरेजनात मात्र या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची कुवतही परमेश्वराने पदरी पडू देऊ नये या विरोधाभासाचेच जास्ती आश्चर्य वाटते.

तर अशी ही सुमित्रा म्हणजे माझ्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने पहिलेवहीले आणि शेवटुन दुसरे एकपात्री प्रेमप्रकरण आसावे. अशा सुतासारख्या सरळसोट प्रकरणाच्या बाबतीत "पुढे काय झाले" यापेक्षा "पुढे काही झाले का" हाच प्रश्न जास्ती संयुक्तिक ठरतो. आणि अशा व्यक्तिच्या प्रेमात पडलेल्यांना "इतक्या सोप्या तलमी अयुष्यात" क्षणिक का होईना पण गुंता निर्माण केल्याचा अभिमान मिरविण्याचा आनंद लुटता येतो. "सुमित्रा" नामक ही एक गुंतवळ तुम्हा स्नेह्यांपुढे झटकताना मलाही अगदी तसाच आनंद होतो आहे.

असो... सुमित्रेला आज ओळख न दाखवण्यामागे आणखीही एक (आणि कदाचित अधिक महत्वाचे) कारण आहे. पण तो खुलासा नंतर कधीतरी. एवढे मात्र नक्की, की आज सुमित्राच काय पण खुद्द ऐश्वर्यालही ओळख द्यावी या मनस्थितीत मी नाही.

Monday, September 25, 2006

गुंत्यात गुंतलेला मी

संगणकाच्या लेखापटलावर मराठीतुन लेखन म्हणजे एखाद्याच्या इच्छाशक्तीने त्याच्याविरुद्ध मांडलेले अघोरी कारस्थानच असावे! आणि तरीदेखील मला हे साहस करण्याचे अहोभाग्य लाभावे, हे केवळ त्या मित्र-द्वयिंची थोरवी. त्यातील एक म्हणजे ज्याने बराहा नामक उपक्रम अस्तित्वात आणला आणि दूसरी, माझा जिवाभावाचा स्नेही अमित, ज्याने माझी या उपक्रमाशी ओळख करून दिली.

असो... तर आता हा सगळा गुंता कशासाठी?... प्रश्नात गुंता आहे खरा,... पण उत्तराला तो गुंत्यातून सोडविल याची काय खात्री? म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न विचारणे नेहमीच होत असते हो, पण गुंत्यातच प्रश्न निघावा, हि कदाचित पहिलीच वेळ असावी! आणि उत्तरात तरी तो नसावा, हि माफक अपेक्षा पुर्ण होईल याची जबाबदारी कोण घेतो?... मी तरी नाही बुवा!

हा केवळ एक गुंता आहे असे म्हणून पुढे-पुढे जायचे, आणि वाटेत सारखे शोधायचे, हे कसे वाटते?... मग तो गुंता कसला का असेना... असेल तो विचारांचा... किंवा भावनांचा... किंवा मग बंधनांचा... तुटलेल्या, विखुरलेल्या... कधीतरी जुळलेल्या... दूरवर पसरलेल्या, अथांग बुडालेल्या.... कुठेतरी चिंब भिजलेल्या... यत्कदाचित तुंबलेल्या ... तर कधीतरी मोकाट सुटलेल्या... कधीकाळी हरवलेल्या... तर कधी हरवून पुन्हा गवसलेल्या... किंवा असेल मग तो गुंता शब्दांचा... मनात ठेवलेल्या... ओठांवर फ़ुटलेल्या... डोळ्यांनी ऐकलेल्या... कानाने नकारलेल्या.... छातीवरच्या हाताने घेतलेल्या... दिलेल्या... देवून मोडलेल्या... मोडून विसरलेल्या... पण तरीही मनात गोठलेल्या...

हा उपक्रम अशाच असंख्य घटनांचा गुंतावळा आहे... हा गुंता सोडविण्यापेक्षा, त्यात गुंतण्यातच जास्ती मजा असते... आणि गुंतलो तरच तो सुटतो... कारण तेव्हाच तर तो उमगतो!... शेवटी, आयुष्य आयुष्य म्हणतात ते म्हणजे काही वेगळं का असतं.... अनंत आठवणींचा गुंताच की तो!